रावण वध मीमांसा
२४. रावण वध मीमांसा
सोन्याची ती लंका जळली, प्रजाहि सारी कष्टी झाली
असला कसला राजा रावण झाला तो नष्ट
पुण्यप्रतापासंगे असता धर्मविजय स्पष्ट!ध्रु.
शक्ति वापरा स्वामीसाठी
शक्ति वापरा धर्मासाठी
नका वापरू स्वार्थासाठी
नरदेही हो कशास होता आचरणे खाष्ट?
सत्तेचा हव्यास कशाला?
जनसेवेचा का कंटाळा?
जो तो द्रव्या का भुललेला?
परनारीची अभिलाषा तर करीतसे नष्ट!२
पतिव्रतेचे ना ऐकियले
विषयविलासी मन बरबटले
व्हायचेच ते अंती झाले
विनाशकाली सुबुद्धीच हो होत असे नष्ट!३
शिवभक्ती ती वरवर होती
त्या ज्ञानाची कसली महती?
मातिमोल तर केली नीती
रावणवध हा सांगुन जातो धर्मकार्य श्रेष्ठ!४
रावण आजहि अत्याचारी
रावण आजहि भ्रष्टाचारी
या दैत्यांना कोण संहरी?
मनामनातुन राघव जागो ही मनिची आर्त!५
दुर्गुणलंका जाळायाची
शूर्पणखा ना रक्षायाची
गोष्ट ऐकणे कल्याणाची
मदोन्मत्त तो रावण होई आचरणी भ्रष्ट!६
शौर्याला द्या जोड नीतिची
दानाला द्या जोड मतीची
कर्माला द्या जोड भक्तिची
प्रसन्न होईल रामचंद्र ही जाणुन उद्दिष्ट!७
श्रीरामाचे साह्य घेउ या
अहंकार रावणा वधू या
चला वंदु या मारुतिराया
रामकथेचा ध्यानी घ्यावा इतुका मथितार्थ!८
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
श्रोतेमुखी रामायण
संकल्पना : जयंत कृ. देवधर
Comments
Post a Comment